पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. या साडेचार वर्षांत भाजपने दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता न करता स्वत:च्या स्वार्थासाठी महापालिका अक्षरश: लुटून खाल्ली. जनतेच्या कररुपी पैशांवर या सत्ताधाऱ्यांनी दिवसाढवळ्या दरोडा घातला, असा घणाघाती आरोप भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला.
दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड विभागीय कार्यालयात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आरतीसाठी शनिवारी (दि. 18) विलास लांडे आले होते. त्यावेळी डिजिटल प्रभातला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभारावर टीका केली.
विलास लांडे यावेळी म्हणाले, राज्य पातळीवर भुलभुलैय्या आणि देशामध्ये वेगळ्या पद्धतीने नेतृत्व उदयाला आले त्यातून नागरिकांची दिशाभूल झाली. शहरामध्ये कारण नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. शहर स्वच्छ आणि सुंदर बनविणार यामध्ये देखील खूप मोठी दिशाभूल नागरिकांची झाली.
त्यामुळे राष्ट्रवादीचे देखील मोठे नुकसान झाले. आता अनेक सोडून गेलेले पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येत असतील तर एक म्हण आहे “सका पाटील गेला आणि तुका पाटील’ आला. त्यामुळे या गोष्टी सुरूच राहतील.
भाजपच्या अंगामध्ये लाचखोरी रुजली आहे. महापालिकेमध्ये जे काही सुरू आहे, ते नागरिकांना दिसत आहे. दिवसा ढवळ्या दरोडा घालण्याचे काम या सत्ताधारी भाजपकडून सुरू आहे. नागरिकांनी ज्यावेळी आपल्याला विश्वस्त म्हणून नेमलेले असते त्यावेळी नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक असते. मात्र भाजपच्या नेत्यांनी स्वस्वार्थासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचे लांडे म्हणाले.
भाजपकाळात शासनाचे दुर्लक्ष
2017 सालच्या निवडणुकीमध्ये नको बारामतीकर म्हणून भाजपने प्रचार केला. मात्र नागपूरकरांनी शहरामध्ये विकासकामे केलीच नाही. नागपूरकरांच्या माध्यमातून शहरात विकासकामांसाठी शासनाचा एक रुपयादेखील आला नाही. राष्ट्रवादीच्या काळामध्ये नाशिक फाट्यावरील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, घरकुल यासारखे मोठ-मोठे प्रकल्प उभे राहिले. त्यामुळे आता 2022 च्या निवडणुकीत जनताच भाजपला धडा शिकवेल. शरद पवार आणि अजित पवार यांच्याच माध्यमातून शहराचा आतापर्यंत विकास झाला असून यापुढेही सुरू राहिल.