वासुंदे – दौंड तालुक्यातील जिरायत भागात 2017 चा हातातोडांशी आलेला खरीप हंगाम वाया गेला. या हंगामातही काहीच हाती लागले नाही, त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. मात्र, 2018ला तरी काहीतरी पदरात पडेल अशी आशा घेऊन शेतकऱ्यांनी बॅंकांसह पतसंस्था, सावकार, तर काहींनी सोने-नाणे मोडून पैसा उपलब्ध केला आणि शेतीच्या मशागती केल्या; पण, निसर्गाच्या नियतीचा खेळ शेतकरीवर्गाच्या जीवांशी खेळ खेळला.
दौंड तालुक्यातील जिरायत वासुंदे, हिगणीगाडा, रोटी, खोर, देऊळगाव, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी, कुरकुंभ, जिरेगाव, लाळगेवाडी भागात खरीप व रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. यावर्षी ही पावसाने शेतकरीच्या भावनांनाच हात घातला आहे. जिरायत भागात अद्याप पाऊस झालेला नाही, यामुळे पावसाळ्यात दुष्काळ पाहायला मिळत आहे. शेतकरी कुटुंबात बॅंकेची कर्ज, मुलांच्या शिक्षण, कुटुंबाचा वैद्यकीय खर्च, जनावरांना चारा, पाणी, अन्य काही गोष्टीचे आर्थिक नियोजन होत नाही, त्यामुळे या भागातील शेतकरी पुरते अडचणीत आले आहेत.
हंगाम वाया…
दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सलग पाचवा खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्याची गरज आहे. कर्जमुक्तीवर एखाद्या समितीमार्फत तातडीने दूरदृष्टीचा पर्याय उपलब्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे.