भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाक पंतप्रधानांना ठणकावले
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा भारताने शुक्रवारी तीव्र शद्बात निषेध केला. त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या आचारसरणीची माहिती दिसत नाही अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली. त्यांची भाषा त्यांच्या पदाला शोभत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार म्हणाले.
भारताने कलम 370 रद्द करण्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील युवकांनी सीमेकडे कूच करावे, त्याला लष्कराने पाठींबा द्यावा,असे इम्रान खान म्हणाले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला रविशकुमार उत्तर देत होते.
ते म्हणाले, पाकिस्तानातील घटनात्मक सर्वोच्च स्थानावर बसल्यानंतर अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्य करण्याची इम्रान खान यांची ही काही पहिली वेळ नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतही त्यांनी असेच प्रक्षोभक वक्तव्य केले होते. आम्ही याचा निषेध करतो. त्यांनी भारताविरूध्द जीहाद करण्याची भाषा केली ही काही सामान्य वर्तुणूक नाही.
पाकिस्तानने आणि त्यांच्या नेत्यांनी सामान्य शेजाऱ्या प्रमाणे वर्तणूक ठेवावी. सहसा ते असे करत नाहीत. आम्ही त्याची अपेक्षाही करत नाही. त्याकडे लक्षही देत नाही. पण काही वेळा आम्हाला तसे करावे लागते, कारण ते आमचे शेजारी आहेत. ते जेव्हा अन्य एखाद्या देशाच्या एकात्मतेला छेद देणाऱ्या गोष्टी करतात, तेव्हा ती गोष्ट त्यांच्या पदाला शोभणारी नसते. पाकिस्तानने त्यांना काश्मीर प्रश्नावर 58 देशांचा पाठींबा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी त्या देशांची यादी जाहीर करावी, असे आव्हानही रविशकुमार यांनी दिले.