नवी दिल्ली – देशातील दळण-वळण व अंतर पार करण्यासाठी महामार्गावरील वाहनांची वेग मर्यादेत वाढ करून ती प्रतितास 140 किमी करण्यात येणार आहे. यासंबंधीचे विधेयक लवकरच संसदेत मांडून ते मंजूर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी म्हणाले, वेगाबद्दल अशी धारणा आहे की, जर कारचा वेग वाढल्यास दुर्घटना होईल. पण माझे वैयक्तिक मत आहे की एक्स्प्रेस-वे वर वाहनांची वेग मर्यादा वाढवून 140 किलोमीटर प्रतितास केली पाहिजे.
तसेच, चार लेन असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर वेग मर्यादा कमीत कमी 100 किलोमीटर प्रतितास असली पाहिजे, तर दोन लेन असलेल्या मार्गांवर आणि शहरी रस्त्यांसाठी वेग मर्यादा क्रमश: 80 किलोमीटर प्रतितास आणि 75 किलोमीटर प्रतितास असली पाहिजे. भारतात वाहनांच्या वेग मर्यादेचा मापदंड निश्चित करणे हे एक मोठे आव्हान आहे, असही गडकरींनी बोलून दाखवले.
कारच्या वेगाबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत. ज्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आहोत. देशात आज असे एक्स्प्रेस वे बनले आहेत की, त्या मार्गांवर कुत्रं देखील येऊ शकत नाही. कारण, मार्गाच्या दोन्ही बाजुने बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. विविध श्रेणींमधील मार्गांसाठी वाहनांची कमाल वेग मर्यादेत सुधारणा करण्यासाठी एक फाइल तयार करण्यात आलेली आहे.
लोकशाहीत आपल्याला कायदा तयार करण्याचा अधिकार आहे आणि न्यायाधीशांना कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार आहे. भारतीय मार्गांवर वाहनांच्या वेग मर्यादेत बदल करण्यासाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केले जाईल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.