लखीमपूर खेरी – शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चार शेतकऱ्यांची हत्या केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला मंत्रिपुत्र आशिष मिश्रा याला स्थानिक न्यायालयाने काल चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला पोलिसांच्या कोठडीत पाठवावे अशी मागणी पोलिसांनी केली आहे, त्यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
आशिष मिश्रा पोलिसांचे समन्स धुडकाऊन फरारी झाला होता, पण दुसऱ्या समन्स नंतर तो पोलिसांपुढे हजर झाला. त्याची अकरा तास चौकशी केल्यानंतर काल रात्रीच त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. तसेच त्याला आठवडाभरात अटक झाली नाही तर पुन्हा देशव्यापी निदर्शने करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.