हृदयातून शुद्ध रक्त घेऊन निघणाऱ्या नलिकेचा आकार वाढणे (ऍब्डॉमिनल ऍऑर्टीक अनेरुझम एएए) या शारीरिक व्याधीच्या भारतातील व्यक्तींची संख्या गेली दोन दशके वाढत असल्याचे अलीकडच्या काही पाहण्यांमध्ये आढळून आले आहे.
या व्याधीचे प्रमाण पुरुषांमध्ये (1.3 टक्के ते 8.1 टक्के) स्त्रियांच्या मानाने (1 ते 2.1 टक्के) जास्त असल्याचेही आढळले आहे. ही व्याधी वयोमानानुसार होऊ शकते; परंतु तंबाखू सेवन आणि धूम्रपान ही कारणेही तिला जबाबदार असल्यामुळे या बाबतीत जागृती होणे आवश्यक आहे.
बहुतांश रुग्णांच्या बाबतीत एएए या समस्येची लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, सर्वसाधारणपणे पोटात, छातीत किंवा पाठीत कमी किंवा तीव्रतेने दुखणे ही लक्षणे आढळल्यास एएएची व्यक्तीची रुग्ण आहे की नाही याची खात्री करावी लागते. या व्याधीवर शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीद्वारे महाधमनी नलिकेत कृत्रिम नलिका बसवणे आता शक्य आहे. या उपचारांत रुग्णाला रुग्णालयात अगदी अल्पकाळ राहावे लागते.
रक्तवाहिनीच्या कमकुवत झालेला भाग फुगून मोठा होणे हे या व्याधीचे स्वरूप आहे. वयोमानामुळे, इतर एखाद्या व्याधीमुळे किंवा जोराचा आघात झाल्यास ही समस्या निर्माण होऊ शकते. यात हृदयातून शुद्ध रक्त घेऊन निघणाऱ्या नलिकेचा आकार वाढतो आणि परिणामतः पोटातील रक्तवाहिनीला सूज ही समस्या उद्भवते. रक्तवाहिनीचा आकार वाढत राहिल्यास ती फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू होतो आणि वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्यास रुग्णाला मृत्यू येण्याचा धोका असतो.
दुर्बिणीतून रक्तवाहिनीत प्रवेश करून कृत्रिम नलिका बसवणे हा अगदी लहानशी शस्त्रक्रिया करून साधणारा इलाज आहे. त्यात शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीची प्रक्रिया नसते आणि रुग्णाला रुग्णालयात अगदी थोडा काळ ठेवावे लागते. त्यामुळे बाधित रुग्णाची प्रकृती लवकर सुधारते.
इंग्लंडमधून आलेल्या एका 45 वयाच्या व्यक्तीला एएएचा त्रास असल्याचे निदान वर्षभरापूर्वी झाले. रक्तवाहिनीत कृत्रिम नलिका बसविण्याच्या शस्त्रक्रियेबद्दल आणि त्या उपचाराच्या फायद्याबद्दल त्यांनी अनेक रुग्णालयात चौकशी केली. मात्र अखेर त्यांच्यावर पुण्यात यशस्वी उपचार झाले.
या प्रक्रियेत रक्तवाहिनी फुगलेल्या ठिकाणी अगदी छोटा छेद करून कृत्रिम नलिका बसवली जाते. धातूच्या फ्रेमभोवती कापड गुंडाळून तयार केलेली ही नलिका असते. काही रुग्णांच्या बाबतीत ही नलिका बसवण्याखेरीज फेमोरल आर्टरी बायपास ही प्रक्रियाही आवश्यक असते. ती करताना रुग्णाला संपूर्ण भूल दिली जाते आणि प्रक्रियेला तीन तास लागतात. त्या
नंतर सुमारे सहा आठवड्यांत रुग्ण पूर्ण बरा होतो. या रुग्णाचे वय आणि शारीरिक स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी होणाऱ्या प्रक्रियेची जागा फक्त बधिर करण्याचा मार्ग निवडला गेला. या उपचारांनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीतील बदल आणि फार श्रमाच्या हालचाली न करणे हे महत्त्वाचे असते.
प्रतिबंधाचे काही उपाय तंबाखू आणि तंबाखूच्या उत्पादनांचे सेवन वर्ज्य करा. धूम्रपान बंद करा आणि इतरांनी धूम्रपान करून सोडलेला धूर श्वासावाटे शरीरात जाणार नाही याचीही काळजी घ्या.
सकस अन्न खा, फळे, भाज्या, कडधान्ये, चिकन, मासे, कमी स्निग्धांश असलेली दूध आणि दुग्धजन्य उत्पादने यांचा आहारात समावेश करा. स्निग्ध पदार्थ आणि मीठ यांचे सेवन कमी करा.
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यावर नियंत्रण ठेवा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमितपणे घ्या. धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी जागृती निर्माण केली पाहिजे, हा शस्त्रक्रियेला उत्तम पर्याय आहे.
नियमित व्यायाम करा. आठवड्याला निदान मिनिटे चालणे, पोहणे, धावणे यासारख्या श्वसनाचा वेग वाढवणाऱ्या व्यायामांवर वेळ खर्च करा. अर्थात व्यायामाची सवय नसेल तर तो हळूहळू वाढवा. तुम्हाला त्यातले कोणते व्यायाम झेपतील हे आधी तुमच्या डॉक्टरांना विचारा.
– डॉ. शार्दूल दाते