कोल्हापूर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना महाविकास आघाडीच्या सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठण केलेले नाही. यामुळे सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे तातडीने पुनर्गठण करावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
कोल्हापुरात चंद्रकांत पाटील आज पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने भाजप सरकारने 2017 मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच पुनर्गठण केले. त्याची मुदत जानेवारी 2020 मध्ये संपुष्टात आली.
मात्र राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने हा आयोग पुनर्गठण करण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे हा आयोग तातडीने पुनर्गठण करण्याची आवश्यकता आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. तरी देखील या सरकारला आयोग पुनर्गठण करण्यासंदर्भात कोणतीही चिंता नसल्याची टीकाही त्यांनी केली.
महाविकास आघाडीच सरकार करोनाचे कारण देत असले तरी सरकारने कोणतीही कामे बंद ठेवलेली नाही. मात्र, बदल्या करण्याचे काम सुरू आहे. तसेच भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि विकासकामे रद्द करण्याचे षड्यंत्र सुरू आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.