नवी दिल्ली – उत्तरप्रदेशात करोनाची स्थिती भीषण आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ हे त्यावरील उपाययोजना करण्यासाठीची जबाबदारी टाळत आहेत, उलट करोनाचा विषाणू हा या शतकातला सर्वात कमकुवत विषाणू असल्याची बालिश विधाने त्यांनी चालवली आहेत असा हल्लाबोल कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री साहेबांनी करोना मुकाबल्यासाठी उत्तरप्रदेशात सर्व सज्जता असल्याचे दावे केले असले तरी खुद्द लखनौमधील स्थिती किती भीषण आहे याच्या बातम्या वर्तमान पत्रात आल्या आहेत. अत्यंत ढिसाळ व्यवस्थापन, अपुरी तयारी, आणि एकूणच ढिलाईमुळे राज्यातील करोनाची स्थिती भयानक झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
लखनौ मध्ये करोनाग्रस्त रूग्णांना रूग्णालयांमध्ये कॉट मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये आल्या आहेत त्याची कात्रणेही प्रियांकांनी त्यांच्या ट्विटर अकौंटवर जोडली आहेत. त्यांनी म्हटले आहे आज रूग्ण चिंतेत आहेत, आरोग्य कर्मचारी चिंतेत आहेत. पण राज्याचे प्रमुख मात्र जबाबदारी टाळून बालिश विधाने करीत आहेत. बरेलीतल्या एका रूग्णालयात छतातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गळत असल्याचा एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.