संगमनेर -निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील अनेक भागांत झालेल्या शेतीपिकांसह विविध नुकसानीची पाहणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशा प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
आंबी खालसा, तांगडी, पाणसवाडीसह पठार भागातील विविध गावांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी ना. थोरात यांनी केली. यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, पं. स. सभापती सुनंदाताई जोर्वेकर, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, उपसभापती नवनाथ अरगडे, प्रियांकाताई गडगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपसरपंच सुरेश कान्होरे, गोकुळ कहाणे, बाळासाहेब ढोले, सुरेश गाडेकर, ऍड. सुहास आहेर, सुहास वाळुंज यांच्यासह महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी ना. थोरात म्हणाले, राज्यात करोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचे मोठे संकट आले होते.
सरकार व प्रशासनाने वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र आपत्कालीन व्यवस्था केली होती. संगमनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या पिकांचे व इतर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास वादळाने हिसकावून घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. या वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे व इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. याचबरोबर या वादळाने तालुक्यात अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला असून, तोही तातडीनी सुरळीत करण्यासाठी काम करावे. या वादळामुळे नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले.