कोल्हापूर : विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची भेट घेतली आणि दुरुस्ती करण्यासाठी लेखी पत्र सुध्दा दिले. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
श्री पटेल यांनी तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याला एस्टीमेट तयार करण्याचे आदेश दिले. पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यक आहेत त्या सर्व कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत अशी सूचना सुद्धा त्यांनी केल्या.
दरम्यान आजची बैठक अत्यंत सकारात्मक झाली असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसच केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे सर्व शिवभक्तांच्या वतीने संभाजीराजे यांनी आभारही व्यक्त केलेत.