मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या आरोपांमुळे वादात सापडलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चित्र वाघ म्हणाल्या कि, धनंजय मुंडेंवर ज्यावेळी बलात्काराचा आरोप झाला हे आमच्यासाठीही तितकंच धक्कादायक होतं. आज ज्या पद्धतीनं तक्रार मागे घेतली गेली हेदेखील तितकेच धक्कादायक आहे. धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरते मर्यादित नव्हते. आम्ही चुकीचे उदाहरण महाराष्ट्रापुढे जाऊ देणार नाही ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामाही मागितला होता, असेही त्यांनी सांगितले.
बलात्कारासारखा गंभीर आरोप धनंजय मुंडेवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी आयपीसी 192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणीदेखील चित्र वाघ यांनी केली आहे. यामुळे ज्या खऱ्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो म्हणून खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, अशी त्यांनी म्हंटले आहे.