टोलनाका हटविण्यासाठी कृती समिती आक्रमक
मागील सात वर्षांपासून नागरिकांची लूट सुरू
पुणे – मुदत उलटूनही पुणे-सातारा रस्त्याचे काम अर्धवट ठेवणाऱ्या कंपनीकडून मागील सात वर्षांपासून खेड शिवापूर टोलनाक्यावर वसुली केली जात आहे. अगदी शहरालगत असलेल्या या टोलनाक्यावर पुणेकर व परिसरातील नागरिकांची लूट केली जात आहे. हा टोलनाका हटविण्यासाठी 16 फेब्रुवारीपासून टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, सभागृहनेते धीरज घाटे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विशाल तांबे, नगरसेवक सुशील मेंगडे, सासवडचे नगरसेवक गणेश जगताप, माजी नगरसेवक दिनेश धाडवे आणि खेड शिवापूर टोलनाक्या विरोधात सीबीआयकडे तक्रार करणारे संजय शिरोडकर यावेळी उपस्थित होते.
पुणे-सातारा रस्त्याचे काम रिलायन्स कंपनीला 2010 मध्ये देण्यात आले असून ते त्यांनी 2013 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. तसा करारही “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने केला होता. परंतु, त्यानंतरही या रस्त्याचे काम अपूर्ण असून, आतापर्यंत या रस्त्यावर 1 हजारांहून अधिक प्राणांतिक अपघात झाले आहेत, अशी माहिती समितीच्या सदस्यांनी दिली. रस्त्याचे काम पूर्ण न करताच या रस्त्याच्या कामापोटी वाहनचालकांकडून टोल वसुली सुरू आहे. वास्तविक, हा टोल नाका अगदी शहरालगत असून भोर, वेल्हा, पुरंदर आणि परिसरात दररोजचा कामधंदा आणि दैनंदीन व्यवहार करणाऱ्या 35 नागरिकांना याचा फटका बसत आहे. 2014 मध्ये टोल वसुली बंद करणे अपेक्षित असताना अद्यापही याठिकाणी करण्यात येत आहे.
आतापर्यंत बेकायदेशीररित्या सुमारे 1,780 टोल वसूल करण्यात आला आहे. विशेष असे की राज्य सरकारशी आवश्यक करार न केल्याने यातील हिस्सा राज्यसरकारला मिळत नसून, कंपनीने परस्पर याची गुंतवणूक केली आहे.