अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका मांडत आहेत. जरांगेच्या भूमिकेला मंत्री छगन भुजबळ हे कडाडून विरोध करत आहेत. आज छगन भुजबळ यांची नगरमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली. तुम्ही तर म्हणाले गुलाल उधळला.. अध्यादेश आला.. आरक्षण मिळालं मग परत उपोषण कशाला ? असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी जरांगे यांना उद्देशून उपस्थित केला.
मराठा समाजाला आमचा विरोध नाही.परंतु त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी स्पष्ट भूमिका यावेळी भुजबळांनी अधोरेखित केली. मुख्यमंत्री म्हणाले मी मराठा समाजाला दिलेली आरक्षणाची शपत पूर्ण केली मग हा ओबीसी आयोग कशासाठी ? असा सवाल देखील भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.
चालू सभेत छगन भुजबळ यांनी काही दाखले दाखवले यामध्ये खाडाखोड करून नोंद करण्यात आल्याचे दाखवले. मराठी कुणबी तसेच कुणबी मराठा अशा नोंदी हाताने लिहिलेल्या नोंदी यावेळी भुजबळांनी सर्वांसमोर मांडत ही दिशाभूल कशासाठी असा सवाल उपस्थित केला.
यावेळी कर्पुरी ठाकूर यांना भारत रत्न दिल्याबद्दल भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.या मेळाव्यासाठी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते देखील उपस्थित होते.