पुणे – पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्टयामध्ये उद्योजकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत. उद्योजकांनी जर पुढे येऊन तक्रारी केल्यास खंडणीखोरांवर गुन्हे दाखल करु, असे आश्वासन नवनियुक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी उद्योजकांना दिले आहे. त्यांनी औद्योगिक पट्टयातील टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही संकेत दिले आहेत.
पंकज देशमुख यांनी नुकताच अधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारला, यानंतर त्यांनी आज(शनिवार) माध्यमांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. येथे स्क्रॅप मालासाठी अनेकदा उद्योजकांना धमकावले जाते. तसेच विविध कारणांसाठी खंडणी उकळली जात असल्याचे निदर्शणास आले आहे. याप्रकारच्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा भर देण्यात येणार आहे. शिवाय उद्योजकांनी पुढे येऊन तक्रारी दिल्यास गुन्हेही नोंदवले जातील. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दुष्टीने कामकाज केले जाईल.
जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे हे आव्हान आहे. मात्र तरीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. अनेक गुन्हेगारी टोळ्या ग्रामीण भागात, शहरात आणि इतर जिल्हयात सक्रीय आहेत. यामुळे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी समन्वय साधून त्यावर अंकुश ठेवला जाईल.
लोकसभेच्या दुष्टीने तयारी –
आगामी लोकसभा निवडणूकीच्या दुष्टीने तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार कामकाज केले जात आहे. शस्त्र जमा करुन घेणे, प्रतिबंधात्मक कारवाया आणि गुन्हेगारांची झाडाझडती यावर भर देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी फोडणार-
ग्रामीण भागात लोणावळा आणि भीमाशंकर तसेच लोणीकंदच्या पुढे अहमदनगर महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी बॉटल नेक आहे तर काही ठिकाणी हॉटेल आणि पेट्रोलपंप चालकांनी अनधिकृथ पंक्चर केले आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी संबंधीत असलेल्या एजन्सीशी संवाद साधण्यात येईल. तात्काळ करावयाच्या उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येतील तर दीर्घ कालीन उपाययोजनांसाठी संबंधीत एजन्सीकडे पाठपुरावा केला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले.