नारायणगाव -जिद्द असली की मार्ग सापडतो हे नारायणगावच्या मयूर रामचंद्र घोलप तरुणाने फिरते रसवंतीगृह सुरू करून सिद्ध केले. अनेक वेळा महिला, लहान मुले, वृद्ध यांना बाजारपेठेत येणे शक्य नसते. मग आपणच त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो तर काय हरकत असा मयूरच्या मनात विचार आला.
घरची परिस्थिती सामान्य असल्याने पोटा पाण्यासाठी फिरते रसवंतीगृह सुरू करण्याचे ठरविले; परंतु त्यासाठी चार लाख रुपये कसे उभे करायचे असा प्रश्न उभा राहिला. घरात पत्नी बरोबर चर्चा करून दोन लाखाचे बॅंकेतून कर्ज व बाकी पैसे पाहुण्यांकडून घेण्याचे ठरविले.
मयूर घोलप याने फिरते रसवंतीगृह तयार करण्यासाठी भंगरातून टायर, स्टेअरिंग, डायनामा साहित्य खरेदी करून घरच्या घरी गाडी बनवून त्यावर संपूर्ण स्टीलची बॉडी असलेले 12 एचपी उसाचे क्रश मशीन बसविले. उसाचे यंत्र व गाडी एकाच मशीनवर चालत असल्याने स्वतंत्र यंत्राचा खर्च कमी झाला.
रसवंतीगृहाची गाडी एक लिटर डिझेलमध्ये 20 किलोमीटर चालते तर उसाच्या यंत्रासाठी दीड तासाला एक लिटर डिझेलची आवश्यकता असते. फिरत्या रसवंतीगृहास ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद बघून मयूर घोलप लवकरच नवीन गाडी बनविणार आहे. गाडीचे स्पीड 60 किमी करून गाडीस मॅटव्हील, डिस्क व गाडीची रुंदी वाढविणार असल्याचे त्याने नमूद केले.
दररोज 1500 रुपये नफा
साधारणपणे दिवसाला 700 ते 800 रुपयांचे इंधन लागते. मयूर फिरते रसवंतीगृह या नावाने चालू केलेल्या व्यवसायास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून रोजचा खर्च वजा जाता 1500 रुपये नफा मिळतो. रसवंती गृहासाठी आठवड्याला 6500 भावाने एक टन ऊस साकोरी (बेल्हे, ता. जुन्नर) येथून खरेदी केला जातो.