पुणे – राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्याची एकत्रित उपलब्ध होणारी मोफत तूरडाळ अथवा हरभरा डाळ अजूनही वितरणासाठी दुकानदारांना उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे दुकानातच अजून डाळ आलेली नसताना ती ताटात कधी येणार, असा प्रश्न रेशनधारकांना पडला आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ प्रतिमाणसी दोन रुपये प्रति किलो दराने गहू व तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 35 किलो धान्य प्रति शिधापत्रिका दोन रुपये प्रति किलो दराने गहू व तीन रुपये प्रति दराने तांदूळ वितरित करण्यात येत असून आतापर्यंत तीन टक्के शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे.
माहे मे महिन्याच्या नियमित अन्नधान्याच्या वितरणाबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (छऋड) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह एक किलो डाळ या परिमाणात तूरडाळ अथवा चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ (एक किलो या कमाल मर्यादेत) माहे एप्रिल व मे महिन्याची एकूण दोन किलो मोफत डाळ वितरित करण्यात येणार असल्याचे यापुर्वीच सरकारने जाहिर केले आहे.
मात्र, रेशनिंग धान्य दुकानदारांकडेच या दोन्ही डाळींचा साठा आलेला नाही, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून रेशनिंगधारकांना डाळ मिळालेली नाही. या दोन्ही महिन्यांतील डाळ या महिन्यांत मिळेल, अशी आशा असताना अद्यापही दुकानदारांकडे डाळ आलेली नाही. त्यामुळे या महिन्यांत तरी डाळ मिळणार का याबाबत शंका आहे.
पुरवठा विभागाकडून उपलब्ध करून दिली जाणारी डाळ अद्यापही दुकानदारांना मिळालेली नाही. मात्र, नागरिकांकडून याबाबतची विचारणा केली जात आहे. याशिवाय ही डाळ नेमकी एप्रिल-मे या दोन महिन्यांकरिता की मे-जून या दोन महिन्यांकरिता आहे, याबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही डाळ उपलब्ध झाल्यास, त्याचे त्वरित वितरण सुरू केले जाणार आहे.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईस शॉपकीपर्स फेडरेशन.