पळसदेव -करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही, पगार नाही, त्यामुळे राहण्याचे व पोटाचे हाल झाले आहेत. या परिस्थितीत या भागातील घरमालक भाडे द्या अन्यथा घर खाली करा अशा धमक्या देत असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. त्यामुळे आता काम नाही मग राहून काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर पंच तारांकित एमआयडीसीमध्ये देखील लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय घरी जाण्यासाठी लवकर सरकारकडून सोय होत नाही, म्हणून पायीच गावाकडे जाण्याचा निर्धार या भागातील मजुरांनी केला आहे. सध्या या वसाहतीत तीन कंपन्या सुरु आहेत. लोणी देवकर एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसह इतर राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. हे मजूर परत गावी गेले तर परत कामगार कुठून आणणार असाही प्रश्न कंपनी मालकांपुढे निर्माण झाला आहे.
शासनाच्या वतीने ज्या कामगारांना गावी जायचं आहे, त्यांना जाण्याची देखील सोय केली आहे, तरी देखील केवळ कंपनी चालवण्यासाठी येणाऱ्या काळात कामगार कमी पडू नये, यासाठी कंपनी मालक पोलीस प्रशासनाला हाताशी धरून जबरदस्ती कामगारांना येथे राहण्यासाठी दबाव टाकत असल्याचे चित्र लोणी देवकर एमआयडीसी भागात पाहावयास मिळत आहे.
सध्या काही कंपनी सुरु करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे सॅनिटायझर, मास्क वापरूनच सध्या दोन शिपमध्ये काम सुरु आहे. शिवाय स्थानिक कामगारांना कामावर बोलावून काम सुरु करण्यात आले असल्याचे माहिती कंपनी व्यवस्थापनाने संगितले आहे. या भागात अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये असलेले कामगार सध्या कामावर गेल्याने सुखावले आहेत. काम सुरू झाले असले तरी करोनची भीती मनात कायमच आहे.