कोल्हापूर – राऊतांवरील कारवाईनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. संजय राऊत असे कोणतेही महान नेते नाहीत की, ज्यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यावर जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर बोलावं, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी राऊतांना टोला लगावला.
ईडीच्या धाडीनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरता कशाला? कोर्टात जा. संजय राऊतांची भाषेची पातळी खूप खालच्या स्तरावर पोहोचली आहे. राज्यातील जनतेला आता राऊतांची भाषा आणि संस्कृतीचे दर्शन घडत आहे.
आमचा एक पडळकर जर थोडा बोलला तर आम्ही लगेच त्याला आवर घातली. कारवाई चुकीची असेल तर त्यांनी कोर्टात जावे. सुरुवातीच्या काळात लोक कौतुकानं बघायचे पण आता राऊतांना कुणी ऐकत नाही. आम्ही चळवळीतील माणसे आहोत, शिवसेनेला घाबरणार नाहीत. राऊतांनी विनाकारण धमक्या देऊ नयेत, असा इशाराच चंद्रकांतदादांनी राऊतांना दिला.
त्याचबरोबर यंत्रणांना त्यांचे काम करु द्या. आता हे सगळे शेवटापर्यंत पोहोचत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असा कोणताच नेता राहिला नाही ज्याच्यावर आरोप नाही. असे सरकार जनतेने कधीच पाहिले नव्हते. संजय राऊतच काय तरत महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मोठी यादीच आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.