पिंपरी – भूतकाळातील प्रेम वर्तमानकाळात येऊन उभे ठाकले आणि दोन कुटुंबे उद्धवस्त झाली. जुन्या प्रेमाला पुन्हा प्राप्त करण्याचा हट्ट पूर्ण न झाल्याने तरुणाने आत्महत्या केली तर त्याच्या आत्महत्येस कारणीभूत मानत तरुणीवर गुन्हा दाखल झाला. हे दोघेही विवाहित होते आणि दोघांनाही अपत्ये होती. यामुळे दोन कुटुंबाची वाताहत झाली.
अभियंता असलेल्या तरुणाला महाविद्यालयीन काळातील प्रेयसी लग्नानंतर अचानक भेटली. तिचेही लग्न झालेले होते. तरी त्याने आपल्या विवाहित प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. मात्र त्यानंतर प्रेयसीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नैराश्य आलेल्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तब्बल चार महिन्यांनी विवाहित प्रेयसीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आत्महत्या केलेल्या 35 वर्षीय अभियंता तरुणाच्या 64 वर्षीय वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 4) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालायातील एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. मात्र शिक्षणानंतर त्यांची ताटातूट झाली. दरम्यान, तरुणाला नोकरी लागली आणि त्याचे लग्न झाले.
तिकडे तरुणीचेही लग्न झाले होते. दोघांचेही संसार व्यवस्थित सुरू होते. दोघांची अचानक भेट झाली. जुन्या प्रेमाने पुन्हा उचल खाल्ली. मात्र दोघांचेही लग्न झाल्याने त्यांना त्याचा अडसर वाटत होता. त्या दोघांनी दुसऱ्या संसाराची स्वप्ने पाहिली.
त्यासाठी तरुणाने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या प्रेयसीने तिच्या पतीला घटस्फोट देण्याचे ठरले. त्यानुसार तरुणाने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र त्याच्या प्रेयसीकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तरुणाचा भ्रमनिरास झाला. प्रेयसी प्रतिसाद देत नसून आपल्याला त्रास देत आहे, आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नाही, असे एका चिठ्ठीत लिहून अभियंता तरुणाने 13 डिसेंबर 2021 रोजी हिंजवडी येथे राहत्या घरात गळफास घेतला.