मुंबई – सत्तासंघर्षावर निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाविकास आघाडीचा पोपट मेला’ अशी टीका केली होती. यावर आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिंदे सरकारचा पोपट मेलाय’ असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “मला वाटले होते की या अख्ख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. बाकी सगळे अतिशहाणे आणि मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीस जर असे बोलत असतील तर त्यांनी शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. त्यांना कायदा, प्रशासन कळतो. राजकारण, पडद्यामागे काय चालले हे कळते. ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत तरी देखील ते अशी वक्तव्य करत आहेत म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी आहे असे दिसते’, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलेलं आहे. पोपट मेलेलाच आहे. ते फक्त विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचे आहे. शिंदे सरकारचा पोपट मेलेला आहे,” असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी नाशिक्मध्ये गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणावर देखील भाष्य केले आहे. “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची पूर्तता होईपर्यंत हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरणे गरजेचे आहे. आमच्या दृष्टिकोनातून हे सरकार बेकायदेशीर आहे. या वक्तव्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये सरकारची ही भूमिका आहे,” असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
“16 आमदारांच्या अपात्रतेबाबात मी यावर काही बोलू शकत नाही. हे प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे यावर सुनावणी होणार आहे. याबाबत जो काही निर्णय द्यायचा आहे, तो निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील.पण एक अभ्यासक, एक वकील आणि 25 वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला आता समजलं आहे की, पोपट मेला आहे. तरी देखील तो मान आणि हात-पाय हलवत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलत आहेत. अशा गोष्टी बोलणं त्यांना सहाजिकच आहे. कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवावं लागतं की, आशा जिवंत आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली होती.