स्वाभीमानीचा इशारा : बारामतीत विधेयकाची होळी
बारामती- कृषी विधेयकाची बारामतीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने होळी करण्यात आली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालून त्याला वाऱ्यावर सोडण्याचा डाव आखला आहे. संबंधित अध्यादेश केंद्र सरकारने पारित केला असेल, तो राबविण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमर कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी अध्यादेश काढला आहे. अगोदरच शेतकरी करोना व आस्मानी संकटामुळे अडचणीत आला आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयक प्रतींची होळी करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास बाबर, युवा जिल्हा सचिव राजेंद्र सपकळ, संभाजी ब्रिगेडचे इंदापूर तालुकाध्यक्ष सचिन अनपट, गजानन चव्हाण आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.