मुंबई – महाराष्ट्राला लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यास जून महिन्यापासून पुन्हा सुरळीत लसीकरण सुरू होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
बालकांच्या कोविडविषयक एका प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकार लस विकत घेण्यासही तयार असून, आम्ही 12 कोटी डोससाठी पैसेही तयार ठेवले आहेत. जूनमध्ये हा पुरवठा सुरळीत होईल अशी आम्हाला आशा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा भासला. पण आता आपण तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुरेशी सज्जता ठेवली असून, त्यावेळी आपल्याला अशा त्रुटी जाणवणार नाहीत असे ते म्हणाले. या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून आपल्याला लहान मुलांना वाचवायचे आहे.
पहिल्या लाटेचा फटका वृद्धांना बसला, दुसऱ्या लाटेने युवकांना लक्ष्य केले आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे मुलांचे संरक्षण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनसारखे कटू निर्णय आम्हाला घ्यावे लागले आहेत. असे निर्णय घेण्याची माझी तयारी आहे, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
राज्य सरकारने लहान मुलांवरील करोनाच्या संभाव्य हल्ल्याच्या संबंधात एक टास्कफोर्स नेमला आहे. त्याचे प्रमुख पद सुहास प्रभू यांच्याकडे देण्यात आले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा या मुलांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन राज्यात बालकांसाठीची रुग्णालये, आयसीयू बेड्स आणि हाय डिपेडन्सी युनिट उभारली जात असल्याची माहिती सुहास प्रभू यांनी दिली.