जयपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष बनावे याविषयी पक्षात एकमत आहे. राहुल अध्यक्ष बनले नाहीत तर देशभरातील कॉंग्रेसजन निराश होतील. अनेक जण घरी बसतील. त्यामुळे आमचेच नुकसान होईल, अशी रोखठोक भूमिका राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी सोमवारी मांडली.
कॉंग्रेस पक्ष नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, पुन्हा अध्यक्ष बनण्यास राहुल अनुत्सूक असल्याचे सूचित होत आहे. त्यामुळे कॉंग्रेससमोर अध्यक्ष निवडीचा मोठा पेच उभा राहिल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर, गेहलोत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी पक्षाची धुरा स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. कॉंग्रेसजनांची भावना ध्यानात घेऊन राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.
कॉंग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा गांधी किंवा बिगरगांधी परिवाराशी निगडीत नाही. अध्यक्षपद हे पक्ष संघटनेशी संबंधित कार्य आहे. त्याचा पंतप्रधानपदाशी संबंध नाही. मागील 32 वर्षांत गांधी परिवारातील कुठलाच सदस्य पंतप्रधान, केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री बनलेला नाही. मग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या परिवाराची धास्ती का वाटते, असा सवाल गेहलोत यांनी केला.
पुढील वर्षी विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेस बाजी मारेल. त्यानंतर 2024 मधील लोकसभा निवडणुकीत पक्ष चकमदार कामगिरी करेल. पुढील निवडणूक मोदींसाठी सोपी नसेल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यात सत्ताबदल घडवून भाजपला हादरा दिला. त्याशिवाय, राहुल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून निदर्शने करून मोदी सरकारची कोंडी केली. त्यामुळे ते सरकार हादरले आहे, असा दावाही गेहलोत यांनी केला.