वारजे -महाराष्ट्रात दंगल झाली, कोयत्या गॅंगची दहशत तर आता खासदार संजय राऊत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. ही अतिशय गंभीर बाब असून राज्य सरकारने तत्काळ राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या घटनांवरून गृहमंत्रालयाचे अपयश दिसून येत आहे. गृहमंत्र्यांना जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टिका सुळे यांनी केली.
वारजे माळवाडी प्रभाग क्र. 32 मधील विविध सोसायट्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यादरम्यान पत्रकारांशी खासदार सुळे बोलत होत्या. खासदार संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकीची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कार्यवाही करून राऊत यांनी झेड प्लस सुरक्षा द्यावी. लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत. याचा अर्थ गृह खात्याचा वचक, दरारा राहिलेला नाही? असा आरोपही सुळे यांनी केला.
या भेटी दौऱ्यामध्ये पुणे महापालिकेच्या माजी विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेविका सायली वांजळे, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप धुमाळ, संजय उर्फ बाबू धुमाळ यांच्यासह पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्याकडे कोणीतरी लक्ष द्या…
लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यामुळे मागील एक वर्षापासून मनपावर प्रशासक आहे. त्यामुळे विकास कोणत्या दिशेने चालला ओह. विकास करताना सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी पुण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.