एमएसआरडीसीच्या कामाला विरोध करीत बिवरीतील शेतकऱ्यांचा इशारा
आमदार अशोक पवार यांना निवेदन सादर
वाघोली (प्रतिनिधी) – बिवरी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांनी रिंगरोडकरीता एमएसआरडीसीकडून जबरदस्तीने होणाऱ्या मोजणीला विरोध करीत हे काम बंद पाडले. बागायती जमिनीतून हा रस्ता जात असल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण असून वेळप्रसंगी आत्महत्या करू, असा इशाही देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासन, संबंधित विभागासह आमदार अशोक पवार यांना दिले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पुण्याच्या पूर्व भागाची वाहतूक वळविण्यासाठी पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग, असे दोन रिंगरोड मंजूर आहेत. यापैकी एक रिंगरोड अंशतः चालू आहे. एमएसआरडीसीचा रिंगरोड हा व्यवहार्य नाही, तरीसुद्धा या रोडची आखणी जबरदस्तीने केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे टी.पी.स्कीम अथवा लॅन्ड पूल यासारख्या योजना राबवून त्यामधून जमिनी लाटणे असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
परंतु, याला कोरेगाव मूळ, प्रयागधाम, बिवरी, गावडेवाडी, वाडेबोल्हाई, लोणीकंद, मरकळ गोलेगाव यासह संबंधीत गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. ज्या जागेतून रस्ता जाणार आहे त्या बागायती जमिनी असून त्यावरच शेतकऱ्यांची उपजिवीका अवलंबून असल्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत संतापाचे वातावरण आहे.
गावातील सर्व बाधित शेतकरी ताण तणावाखाली असून वेळप्रसंगी आत्महत्या करण्याचा इशाही दिला आहे. सदर मोजणीस पोलीस प्रशासनाने संरक्षण देऊ नये, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेने निवेदनाद्वारे केली आहे. याची प्रत आमदार अशोक पवार यांनाही देण्यात आली आहे. यावेळी रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी, संस्थेचे सचिव प्रभाकर कामठे, पोलीस पाटील जिजाबा गोते, माजी उपसरपंच गणेश चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र झेंडे, काळुराम गोते, रंगनाथ कड, विजय पायगुडे, अमोल भोसले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.