नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते.
दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे मला वाटतं की, जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती, असे अमित शाह म्हणाले.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये करोना योद्ध्यांवर हल्ले झाले आहेत. यावर बोलताना शाह यांनी, सरकार प्रत्येक करोना योद्ध्यासोबत आहे. देशभरात अशा ७० ते ८० घटना समोर आल्या आहेत तसेच प्रत्येक ठिकाणी कठोर पावले उचलण्यात आली. भारतात आजवर जितकी संकट आणि महामारी आली आहे. त्याच्याशी सर्व सरकारांनी लढा दिला आहे. प्रत्येक वेळी सरकारांनी परिवर्तने आणली होती. मात्र, यावेळी संपूर्ण देशचं याच्याशी लढत आहे. लोकांनी जनता कर्फ्यू, थाली वाजवून आणि करोना योद्ध्यांचा सन्मान करुन देशाला या महामारीविरोधात मजबूत केले. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पहिल्या लॉकडाउनवेळी अशा काही घटना घडल्या ज्यामुळे करोना विषाणूच्या केसेस वाढल्या. यामध्ये दिल्लीतील मरकजच्या प्रकरणाचाही समावेश आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सरकारांनी करोनाचा फैलाव होण्यासाठी मरकजच्या कार्यक्रमाला जबाबदार धरले होते. त्यावेळी या कार्यक्रमामुळे सुमारे ३० टक्के करोना विषाणूचा फैलाव संपूर्ण देशात झाल्याचे सांगितले जात आहे.