श्रीगोंदा – 25 मे पर्यंत कुकडीचे आवर्तन सुटणे अपेक्षित होते, परंतु कुकडी लाभक्षेत्रात नसणाऱ्या बंधाऱ्यांना पाणी सोडले जात आहे, आणि कालव्यावरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, हा अन्याय आहे. 1 जूनपर्यंत कुकडीच्या कालव्याला पाणी न सुटल्यास 1 जूनपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.
याबाबत पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची कमतरता भासू लागली आहे. कर्जत, करमाळा तालुक्याला पाणी देण्यापूर्वी तालुक्यातील मागील आवर्तनात पाणी न मिळालेल्या भागात पाणी देऊन पिके वाचवावीत. पिण्याचे पाणी आणि फळबागा यासाठी 1 जूनपासून पाणी सोडण्याचे नियोजन होते.
तथापि अद्याप तशी व्यवस्था झालेली नसल्याने 1 जूनपासून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन सोडून मागील आवर्तनात वंचित राहिलेल्या वितरिका व तलाव यांना प्राधान्याने पाणी देण्याची व्यवस्था करण्याची मागणी पाचपुते यांनी केली आहे. 1 जूनपर्यंत पाणी न सुटल्यास 1 जूनपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.