मुंबई – राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं. तर भाजप आणि शिवसेना यांच्यातील अनेक वर्षांची युतीही तुटली. त्यावेळी झालेल्या सत्तासंघर्षासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गौप्यस्फोट केला आहे.
‘सन्मान देवदूतांचा’ हा विशेष कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात करोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती होती. यावेळी आठवले बोलत होते.
यावेळी आठवलेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर मिश्किलपणे बोट ठेवलं. ‘त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते’, असं आठवले म्हणाले. ते सत्तासंघर्षाच्या काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की शिवसेनेला अडीज वर्ष मुख्यमंत्रिपद देऊन टाका…माझं ते म्हणणं फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असा गौप्यस्फोट आठवले यांनी केला.
आठवले एवढंच बोलून थांबले नाही तर तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असंही त्यावेळी मी सांगितलं होतं, अशी आठवणही आठवलेंनी सांगितली.