मुंबई – देशातील लोकशाही वाचवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच कर्नाटकात भाजपविरोधी सरकार सत्तेत येणार आहे, हीच परिस्थिती आज देशभर आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. विरोधकांनी एकत्र राहिल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षनेते सतत एकमेकांना भेटून पुढील रणनीतीवर चर्चा करत आहेत.
शरद पवार म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे. विरोधकांची मोळी बांधण्याची गरज आहे. देशातील परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्रित काम केल्यास हुकुशाहीविरोधात एक पर्याय देता येऊ शकेल. तसेच महाराष्ट्रात देखील एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे कर्नाटकातील जनताही भाजपला हटवून धर्मनिरपेक्ष सरकार निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच याआधीही विरोधकांची एकजूट मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
नितीश कुमार म्हणाले की, देशात भाजप जे काही करत आहे ते चुकीचे आहे. भाजप देशविरोधी काम करत आहे. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्रित आल्यास लोकशाही वाचेल. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज शरद पवारांची भेट घेतली. इतरही विरोधी पक्षांच्या आम्ही भेटी घेऊ. तसेच शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर वाईट वाटल्याचे नितीश कुमार म्हणाले. आमचे हेच म्हणणे होते की विरोधी पक्षांना तुमची गरज आहे. त्यामुळे राजीनामा मागे घ्या, अशी आमची मागणी होती, असेही नितीश कुमार म्हणाले.
…तर आनंदच वाटेल – नितीश कुमार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जर 2024 सालच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा चेहरा झाल्यास आपल्याला आनंदच वाटेल, असे जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले. भाजप देशविरोधी काम करत असून त्याच्याविरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.