Rahul Gandhi : तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. येत्या 30 नोव्हेंबरला तेलंगणामध्ये 119 जागांसाठी विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस सत्तेवर आल्यास महिलांना 4 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल, असे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले. राहुल गांधी कालेश्वरम प्रकल्पाच्या मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजजवळील अंबाथीपल्ली गावात महिलांच्या सभेला संबोधित करत होते.
राहुल गांधी म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी लुटलेले सर्व पैसे कॉंग्रेसने परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, केसीआर राव यांनी केलेल्या लुटीचा सर्वाधिक फटका तेलंगणातील महिलांना बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी लुटलेली रक्कम तुमच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. सामाजिक पेन्शन, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात आणि मोफत बस प्रवास यासारख्या सुविधांमध्ये हा लाभ महिलांना मिळेल.”
याचबरोबर, राहुल गांधी म्हणाले की, पहिले पाऊल म्हणून प्रत्येक महिन्याला सामाजिक पेन्शन म्हणून महिलांच्या बँक खात्यात २५०० रुपये जमा केले जातील. तसेच, १,५०० रुपयांचीही बचत होणार आहे, कारण काँग्रेस सत्तेत आल्यास एलपीजी सिलिंडर ५०० रुपयांना मिळेल आणि महिला सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील, ज्यामुळे त्यांची सुमारे १,००० रुपयांची बचत होईल. या सगळ्यातून तुम्हाला दरमहा ४ हजार रुपयांचा फायदा होईल. याला पराजाला सरकार म्हणजेच लोकांचे सरकार म्हणतात, असे राहुल गांधी म्हणाले. तेलंगणात एक लाख कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केला.