भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसीच्या महिला विश्वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला. मात्र, विजयी सातत्य राखल्यावरही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निर्धाव (डॉटबॉल) चेंडूंचा आहे. यातून मार्ग काढण्यात संघाला यश आले तर ज्या धावा 20 षटकात सध्या दिसत आहेत, त्यात किमान 40 ते 50 धावांची वाढ होईल.
भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना परंपरागत प्रसिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. त्यात आपल्या संघाने 7 गडी राखून विजय प्राप्त केला. मात्र, त्यात जवळपास तीन षटके म्हणजे 18 चेंडू निर्धाव होते. त्यानंतरही यात सुधारणा झाली नाही. त्यानंतर वेस्ट इंडीजचा पराभव करतानाही जवळपास 18 चेंडू म्हणजेच तीन षटके निर्धाव ठरली. या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत सातत्याने खेळाडूंशी संवाद साधत होती, मात्र, तिला व अन्य फलंदाजांनाही यश आले नाही. यानंतर आपला संघ इंग्लंडकडून पराभूत झाला. त्यात आक्रमक फलंदाजीनंतरही तब्बल 51 चेंडू निर्धाव ठरले.
त्यानंतर आयर्लंडशी झालेल्या लढतीत डकवर्थ-लुइस नियमानुसार आपण 5 धावांनी विजयी ठरलो व उपांत्य फेरीतही दाखल झालो. मात्र, त्या सामन्यातही तब्बल 41 चेंडू निर्धाव ठरले. हा खूप मोठा प्रश्न आहे कारण जर यातील निम्मे चेंडू जरी धावांचे ठरले असते तरीही संघाची धावसंख्या जी मुळात होती त्यात किमान 25 ते 35 धावांची वाढ झाली असती.
आपले फलंदाज देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळतात तेव्हा प्रत्येक सामना टी-20 क्रिकेटचा निश्चितच नसतो त्यामुळे वेगाने धावा करण्याचे कोणतेही बंधन नसते आणि हीच सवय सध्या भारताच्या महिला संघाला मारक ठरत आहे. स्मृती मानधना, शफाली वर्मा, रिचा घोष, जेमिमा रॉड्रीक्स या फलंदाज आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जातात तर कर्णधार हरमनप्रीत कौर धोका न पत्करता वेगाने धावा करते. मात्र, याच फलंदाजांनी जितक्या संख्येने चेंडू निर्धाव घालवले त्याचा हिशेब केला तर ज्या सामन्यात आपल्या 150 धावा झाल्या त्या 180 पर्यंत वाढल्या असत्या.
आता आपला संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. या लढतीत आपल्यासमोर ऑस्ट्रेलिया किंवा अन्य कोणताही संघ असो प्रत्येक चेंडूवर किमान एक धाव घ्यायचीच हाच हेतू असला पाहिजे तरच यश हाती लागेल व बलाढ्य ऑस्ट्रेलियासारख्या संघांनाही आपण स्पर्धेबाहेर घालवू शकतो.
खूप वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटच जेव्हा खेळले जात होते तेव्हा सर डॉन ब्रॅडमन म्हणाले होते की, मला प्रत्येक चेंडूवर धाव दिसते. कधी एक, कधी दोन, कधी चौकार तर कधी षटकार. एकही चेंडू वाया न घालवता चेंडूच्या दर्जानुसार धावा करता आल्या पाहिजेत. तेच आता भारताच्या महिला संघाकडूनही अपेक्षित आहे.