MEN’S ICC TEST BOWLING RANKINGS : जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत खेळला नव्हता. वास्तविक या वेगवान गोलंदाजाला विश्रांती देण्यात आली होती. मात्र जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah ) आयसीसी कसोटी क्रमवारीत कोणताही फरक पडलेला नाही. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. जसप्रीत बुमराह 867 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत या वेगवान गोलंदाजाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह इंग्लिश फलंदाजांसाठी अडचणीचा ठरला आहे.
कसोटी क्रमवारीत भारताचाच फिरकीपटू आर अश्विन (846) दुसऱ्या तर आफ्रिकेचा कागिसो रबाडा (834) तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (822) आणि फिरकी गोलंदाज नॅथन लायन (797) यांना चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. हेझलवूड एक स्थानाने पुढे सरकत चौथ्या स्थानावर तर लियॉनने दोन स्थानांनी प्रगती करत सहावे स्थान गाठले आहे. वेलिंग्टनमध्ये हेझलवूडने चार आणि लियॉनने 10 विकेट घेतल्या होत्या. क्रमावारीत इतर भारतीय गोलंदाजांबदल बोलायचे झाले तर भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा (785) हा सातव्या तर मोहम्मद सिराज (608) आणि मोहम्मद शमी ( 604) अनुक्रमे एकवीस-बावीस क्रमाकांवर आहेत,
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. तर हा वेगवान गोलंदाज रांची कसोटीचा भाग नव्हता. त्याचबरोबर या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा टॉम हार्टली पहिल्या क्रमांकावर आहे. टॉम हार्टलीच्या नावावर 20 विकेट आहेत, मात्र या फिरकीपटूने जसप्रीत बुमराहपेक्षा 1 कसोटी जास्त खेळली आहे. जसप्रीत बुमराहच्या नावावर 4 कसोटी सामन्यात 13.65 च्या सरासरीने 17 बळी आहेत.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांबद्दल बोलायचं झाल तर टॉम हार्टली आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय रवींद्र जडेजा, रवी अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र या सर्व गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहची सरासरी सर्वोत्तम आहे.
त्याचबरोबर या मालिकेत भारतीय संघ 3-1 ने आघाडीवर आहे. अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. मात्र, या मालिकेतील पाचवी कसोटी 7 मार्चपासून खेळवली जाणार आहे. धर्मशाला येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.