दुबई – सातत्याने बायोबबलमध्ये राहिल्यामुळेच भारतीय संघाची कामगिरी खालावली, असे मत भारतीय संघाचे मावळते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले होते. आता खुद्द आयसीसीनेही त्यांच्या या मताची दखल घेतली असून आयसीसीच्या बैठकीत याबाबत फेरविचार केला जाणार आहे.
बायोबबल रद्द होणार नसले तरीही त्यातून काही सवलती मिळणार का किंवा खेळाडूंवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी काही उपाय करता येतील का हा या बैठकीतील प्रमुख मुद्दा असेल.
यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीही गाठता आली नाही. या स्पर्धेतील सुपर-12 गटातील केवळ तिनच सामने भारताना जिंकले. यानंतर गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बायोबबलवर प्रश्न उपस्थित केले.
या स्पर्धेत सहभागी झालेले भारतीय खेळाडू सहा महिन्यांहून अधिक काळ बायोबबलमध्ये होते. त्यासाठीच आयसीसी आता इंग्लिश प्रीमियर लीगचा (ईपीएल) आराखडा तयार करण्याच्या विचारात आहे. ईपीएल स्पर्धेत विविध व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही विलगीकरणात पाठवले जात नाही. केवळ ज्या व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटिव्ह येते त्यांनाच विलगीकरणात पाठवले जाते. आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीत बायो-बबलच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
बायोबबल हे दीर्घकाळासाठी लाभदायक नसल्याचे मतही आयसीसीच्या अनेक सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता याबाबत लवकरच काही ठोस निर्णय घेतला जाण्याचे संकेतही मिळत आहेत.