मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी (दि. 3) हल्ला करण्यात होता. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली असून, या हल्ल्यात देशपांडे त्यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही. त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान, नुकतंच पार पडलेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरेंनी संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “मी माझ्या मुलांचं रक्त असं वाया घालवू देणार नाही…’ असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. मनसेचा काल 9 मार्च 17 वा वर्धापन दिन सोहळा होता या निमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले.., “आत्मचरित्राची 4 पानं वाढली, असं म्हणत राज ठाकरे यांनी गंमत केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकचा हशा पिकला. पुढे ते म्हणाले.. “घटना घडल्यानंतर मी त्या दिवशी बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं की हे कुणी केलं असेल. एक निश्चित सांगतो… ज्यांनी केलंय हे त्यांना आधी समजेल की हे त्यांनी केलंय. त्यानंतर सर्वांना समजेल की हे त्यांनी केलंय. मी माझ्या मुलांचं रक्त असं वाया घालवू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आलेत, या फडतूस लोकांसाठी नाही” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.