नवी दिल्ली – आगामी ऑलिम्पिक स्पर्धा समोर असताना भारतीय खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकाची खरी गरज आहे. सातत्याने होत असलेल्या दुखापती व त्यातून बाहेर पडल्यानंतरचा सराव यांसाठी परदेशी प्रशिक्षकांइतके योग्य मार्गदर्शन कोणीच करू शकत नाही. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) लवकरात लवकर असा प्रशिक्षक नियुक्त करावा, अशी मागणी भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने केली आहे.
वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात अन्य कोणत्याही खेळापेक्षा जास्त दुखापती होतात. त्यावेळी त्याचे योग्य निदान होत नाही. वैद्यकीय तज्ज्ञदेखील त्याबाबतच्या चाचण्या केल्याशिवाय उपचार करु शकत नाहीत. या तुलनेत या खेळातील खेळाडूंना कशा प्रकारच्या दुखापती होतात याचे ज्ञान परदेशी प्रशिक्षकांना जास्त असते, असे चानूने व्यक्त केले.
या खेळात पाठीच्या दुखण्याने खेळाडू जास्त त्रस्त असतात. वेटलिफ्टिंगमध्ये पाठ, पाय, हात, कंबर आणि पाऊले सशक्त आसावी लागतात. याबाबत गेल्या काही वर्षांपासून परदेशी प्रशिक्षकांची मागणी आम्ही करत आहोत मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असेही चानू हिने सांगितले.
“टॉप’बाबत गांभीर्य असावे…
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सुरु केलेल्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेत सहभागी असलेल्या खेळाडूंच्या दुखापतींबाबत तरी गांभीर्य दाखवले पाहिजे, असेही चानू म्हणाली. गेल्या दोन वर्षांत स्वतः चानूदेखील पाठदुखीने त्रस्त आहे. ती स्पर्धा खेळत असली तरी सातत्याने तिचे दुखणे डोके वर काढते त्यामुळेच तिने पुढाकार घेत ही मागणी केली आहे.