नांदेड – मागील काही वर्षांत शेतकरी पुत्रांना मुली मिळत नसल्याचा सतत आरोप होत आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलगी देखील शेतकरी जोडीदार नको, अशी अट घालते. शेती करणाऱ्यापेक्षा नोकरदार मुलगा असावा, अशी अपेक्षा बहुतांश मुलीच्या पालकांची पाहायला मिळत आहे. एकीकडे अशी सर्व परिस्थिती असताना नांदेड जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलीने मला शेतकरी नवराच हवा असल्याचा हट्ट धरला आहे. शेवटी मुलीच्या हट्टापुढे आईवडिलांचेही काही चालेना आणि त्यांनी मुलीची इच्छा पूर्ण केली आहे.
तीन शाखांत पदवीधर, त्यानंतर पीएच.डी.चे शिक्षण सुरू असताना आणि एका खासगी बॅंकेत नोकरी करणाऱ्या येथील साप्ती गावातील वैष्णवी दिंगबरराव कदम हिने मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून मला शेतकरीच नवरा पाहिजे, असा वडिलांकडे हट्ट धरला होता. तर तिचा हा हट्ट वडिलांनीही पूर्ण केला आहे. त्याप्रमाणे, रविवारी अर्थात 9 जुलै रोजी एका शेतकरी मुलासोबत वैष्णवीचा विवाह पार पडला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील शेतकरीपुत्र नितीन यांच्याशी वैष्णवीचा विवाह झाला.
अलीकडे आईवडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून, जावई नोकरीवाला शेधतात. मुलगी डॉक्टर असेल तर मुलगा डॉक्टरच शोधतात. तसेच शिक्षक, इंजिनिअर, बॅंकेत, पोलीस आदी क्षेत्रांत मुली नोकरी करत असल्यास, त्याच क्षेत्रात नोकरी करणारा मुलगा शोधला जातो. यामुळे ग्रामीण भागांत शेतकरी मुलांना सहसा मुलींचे स्थळ भेटणे अवघड झाले आहे.
महानगरात राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुली शक्यतो शहरी मुलांसोबत लग्न करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नाही. परंतु, उच्चशिक्षित असलेल्या वैष्णवीच्या या भुमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या या लग्नाची परिसरात चर्चा देखील होत आहे.