नवी दिल्ली – युध्दग्रस्त युक्रेनमधून आलेल्या भारतीय मुलांना सांत्वनाची गरज होती. ती मुले घाबरलेली होती. त्याऐवजी आम्ही कसे आणले वगैरे ते बोलायला लागल. मला मुलांची काळजी असल्यानेच मी तुम्ही काय करणार ते सांगा, असे त्यांना म्हटले. त्यावेळी मला ते मंत्री असल्याचे माहीत नव्हते मात्र माहित असते तरी मी हेच बोललो असतो, अशी रोखठोक भूमिका रोमानियातील स्नेगोव्ह शहराचे महापौर मिहे एंगेल यांनी मांडली. मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्याशी झालेल्या वादावादीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
रशिया युक्रेन संकटादरम्यान रोमानियामधून भारतीय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची रोमानियाच्या महापौरांशी वादावादी झाली. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत महापौर म्हणाले की, मला कोणताही राजकीय वाद नको होता. मला फक्त भारतीय विद्यार्थ्यांची काळजी होती. जे युद्धग्रस्त भागातून कसेबसे बाहेर पडले होते आणि ते भारतात कधी आणि कसे पोहोचतील हे जाणून घ्यायचे होते. शिंदे कॅमेरे वगैरे घेऊन संध्याकाळी उशिरा तेथे पोहोचले होते. ते भाषण द्यायला आलेले दिसत होते. तर त्यांनी घाबरलेल्या विद्यार्थ्यांचे सांत्वन करायला हवे होते.
हे विद्यार्थी 27 फेब्रुवारीला सीमा ओलांडून येथे आले होते. स्नेगोव्ह येथील एका गावातील व्यायामशाळेत त्यांना आश्रय देण्यात आला. स्थानिक दूतावासाशी संलग्न भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की बस दुसऱ्या दिवशी पोहोचतील, असे महापौरांनी म्हटले.
जेव्हा शिंदे तेथे पोहोचले तेव्हा मला आशा होती की त्रासलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मात्र शिंदे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना ते येथून कधी बाहेर पडतील हे सांगितले नाही. त्यांनी भारतासाठी फ्लाइट कधी आहे याबाबत माहिती दिली नाही. उलट काही कुत्र्यांना तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे ते सांगत होते. विद्यार्थी त्यांच्या घरी कधी पोहोचतील, हे त्यांना सविस्तर सांगायला हवे. ते त्यांनी न सांगितल्यामुळेच माझी नाराजी होती.
त्या मुलांची मला चिंता असल्याने मला राग आल्याचे सांगून महापौर म्हणाले. मी त्या मुलांच्या वेदना पाहिल्या आहेत आणि त्याचा वापर कोणत्याही प्रसिद्धीसाठी होऊ नये अशी माझी इच्छा होती. शिंदे हे मंत्री आहेत हे मला माहीत नव्हते. हे मला कळले असते तरी मला तितकाच राग आला असता, असे महापौरांनी म्हटले.