नवी दिल्ली –दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे टाळत गोवा गाठले. ईडीला पुन्हा पत्र पाठवत त्यांनी मी आरोपी नाही; मग समन्स कशासाठी, असा सवाल विचारला.
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी त्या केंद्रीय यंत्रणेने याआधी तीन समन्स बजावूनही केजरीवाल हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना चौथ्यांदा समन्स बजावण्यात आले. त्यांना चौकशीसाठी गुरूवारी किंवा शुक्रवारी हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, ते तीन दिवसीय दौऱ्यासाठी गोव्यात दाखल झाले. त्या दौऱ्यात ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपच्या गोवा शाखेने केलेल्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
केजरीवाल यांनी आधीप्रमाणेच ईडीला चौथ्या समन्सवरून उत्तर पाठवले. कायद्याच्या नजरेत ईडीचे समन्स अवैध आहे. अशाप्रकारची समन्स याआधी न्यायालयांनी रद्द केली आहेत. याआधी मी पाठवलेल्या पत्रांना ईडीने प्रतिसाद दिलेला नाही. राजकीय कारस्थानाचा भाग म्हणून समन्स पाठवले जात आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास २ वर्षांपासून सुरू आहे. त्यातून अद्याप काहीही हाती लागलेले नाही.
तपासावेळी काही पैसे वसूल झाले का अशी विचारणा न्यायालये करत आहेत. निवडणुकीआधी मला समन्स का बजावली जात आहेत? मला प्रचार करण्यापासून रोखणे हा त्यामागील उद्देश आहे, असा आरोप केजरीवाल यांनी पत्रातून केला.
केजरीवाल यांच्यावरून आप आणि भाजपमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले. घोटाळ्याचे सूत्रधार असल्याने केजरीवाल यांना अटकेची भीती वाटत आहे. त्यामुळे ते ईडीसमोर हजर राहण्याचे टाळत आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावरून आपने पलटवार केला. केजरीवाल यांना अटक होईल याची माहिती भाजपला कशी? केजरीवाल यांना आरोपी म्हणून बोलवायचे की साक्षीदार म्हणून याविषयी ईडीच अनभिज्ञ दिसते. ईडीच्या समन्सची कथा भाजपने लिहिलेली असावी. त्या पक्षाला ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून निवडणूक लढायची आहे, असा प्रत्यारोप आपने केला.