दिल्लीत कॉंग्रेसमुळे आप विजयी : जावडेकर
अमित शहा यांनी नोंदवलेली निरीक्षणे महत्त्वाची
पुणे – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या लढाईत कॉंग्रेस अचानक गायब झाली. कॉंग्रेस स्पर्धेपासून दूर गेल्यानेच भाजप पराभूत झाली. तसेच कॉंग्रेसने आपली मते आम आदमी पक्षाकडे वळवली, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर जावडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर जावडेकर म्हणाले, “दिल्ली निवडणुकीमध्ये भाजपला 42 आणि आपला 48 टक्के मते मिळतील, असा अंदाज होता. मात्र, आपला 51 आणि भाजपला 39 टक्के मते मिळाली. आमचा फक्त तीन टक्के अंदाज चुकला आहे. निवडणुकीमध्ये चढउतार होत असतात. भाजप हा पक्ष शिकणारा आहे. आम्ही या पराभवातून शिकू.’
“अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत आणि त्याचे अनेक पुरावे आहेत, असे मी बोललोच नाही,’ असे जावडेकर म्हणाले.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोली मारो आणि भारत पाक सामना यासारख्या द्वेषयुक्त भाषणामुळे भाजपचा पराभव झाल्याचे गुरुवारी सांगितले. त्यावर जावडेकर म्हणाले, “शहा यांनी नोंदविलेली निरीक्षणे महत्त्वाची आहेत. परंतू पराभवाची इतर कारणे देखील आहेत, त्याचे पुनरावलोकन केले जाईल.’