मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असणारी शिंदे गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले.
तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय अतिशय सुखावणारा आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, अश्यातच आता राज्यातील या राजकीय परिस्थितीवर कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ यांनी देखील आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुखातील बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. देशाची राजधानी दिल्ली भाजपाच्या ताब्यात नाही किंवा काँग्रेसच्या ताब्यात नाही. त्याचप्रमाणे 2024 मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या..!’ असं विधान अभिजित बिचुकले यांनी केलं आहे.
यावेळी बिचुकले म्हणाले, “मी लोकशाही मानणारा नागरिक आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे जातात. मला अद्याप लोकांनी निवडून दिलं नाही. त्यामुळे येत्या काळासाठी मी एवढंच सांगेन की, जे झालं ते पुरेसं झालं. आता हे कुणीही असतील शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, जे कुणी असेल त्या सगळ्या पक्षांना एकदा घरीच बसवा.
अभिजीत बिचुकले तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून आला आहे. अभिजीत बिचुकले अतिशय परखड मतं देणारा.. असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. देशाची राजधानी दिल्ली भाजपाच्या ताब्यात नाही किंवा काँग्रेसच्या ताब्यात नाही. त्याचप्रमाणे 2024 मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या..! असं देखील बिचुकले यावेळी म्हणाले आहेत.