कोलकाता – भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होण्यासाठी मीदेखील उत्सुक आहे. मात्र, सध्या तरी या पदावर काम करण्यासाठी मी अर्ज केलेला नाही असे भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितले.
भारताचे प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्ज मागविले आहेत. विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे वेस्ट इंडिजचा दौरा संपेपर्यंत सूत्रे राहणार आहेत. गांगुली हे सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. तसेच आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे सल्लागार म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळेच त्यांनी प्रशिक्षकपदात स्वारस्य दाखविलेले नाही. मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी)अध्यक्षपदी काम करताना त्यांनी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड केली होती.
गांगुली यांनी सांगितले की, सध्या माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. मात्र भविष्यात मला या पदावर काम करण्यास निश्चितपणे आवडेल. ही जबाबदारी सोपी नसली तरी या पदावर काम करण्यासाठी आवश्यक असणारा अनुभव माझ्याकडे निश्चित आहे. भारताचा प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सीएसीकडे देण्यात आली असून या समितीचे मुख्य म्हणून ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिलदेव काम पाहत आहेत. या समितीमध्ये माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड व भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने शास्त्री यांचीच पुन्हा निवड व्हावी अशी शिफारस केली आहे. त्याला ही शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे व त्याच्या मताचा आदर केला पाहिजे असे कपिलदेव यांनी नुकतेच सांगितले होते.
गांगुली यांनी सांगितले की, या पदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये खूप मोठ्या नावांचा समावेश नाही. श्रीलंकेचे ज्येष्ठ खेळाडू माहेला जयवर्धने यांनी त्यासाठी तयारी दर्शविली होती. मात्र, त्यांचा अर्ज आला नसल्याचे समजते. शास्त्री यांची कारकीर्द कशी झाली याबाबत मी मत व्यक्त करणार नाही.
वेस्ट इंडिज दौऱ्याबाबत ते म्हणाले की, ‘या दौऱ्यात भारतापुढे खडतर आव्हान असणार आहे. त्यांच्या देशात नेहमीच त्यांचे वर्चस्व असते. टी-20 सामन्यांमध्ये त्यांचे खेळाडू जास्त सकारात्मक खेळ करतात. या स्वरूपामध्ये ते सध्या विश्वविजेते आहेत. फ्लोरिडात होणारे दोन्ही सामने रंगतदार होतील. कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजयाची अधिक संधी असेल. या दौऱ्यात युवा खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवित आपली बाजू बळकट केली पाहिजे’.