पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आजारपण ही तशी वाईट गोष्ट. मात्र, मुलीचे आजारपण दोघांच्या संसारासाठी वरदान ठरले आहे. सहा वर्षे वेगळे राहणारे दोघे मुलीला डेंग्यू झाल्याने महिनाभर एकत्र राहिले. तिच्या भवितव्याचा विचार करत दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये वकिलांनी केलेले समुपदेशनही महत्त्वाचे ठरले आणि त्यांच्या नात्यातील सहा वर्षांचा दुरावा संपुष्टात आला.
माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलली आहेत) दोघेही उच्चशिक्षित. आयटी क्षेत्रात कार्यरत. तो उत्तर प्रदेशचा, तर ती पश्चिम बंगाल येथील. बेंगलोर येथे एका कंपनीत कामाला होते. सुरुवातीला मैत्री आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी २००९ मध्ये विवाहही केला. संसार सुरळीत सुरू असताना दोघे हिंजवडी येथे स्थलांतरित झाले.
दोघांना २०१८ मध्ये एक मुलगी झाली. त्यानंतर माधवची परदेश वारी झाली. दोघांत चारित्र्याच्या संशयावरून वाद होऊ लागले. वाद इतके विकोपाला गेले की, दोघे विभक्त राहू लागले. तिने २०२० मध्ये प्रथमवर्ग् न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला.
तर त्यानेही वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे अॅड. प्रणयकुमार लंजिले, अॅड. अनिकेत डांगे आणि अॅड. लक्ष्मण सावंत यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघातील वाद सुरूच होते. दरम्यान, सहा वर्षीय मुलगी आजारी पडली. तिला डेंग्यू झाला.
तिला काही दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले. त्या कालावधीत माधवही रुग्णालयात राहिला. दरम्यान, मुलीच्या हट्टानुसार आणखी काही दिवस दोघे घरी एकत्र राहिले. मुलीने ‘मम्मी-पप्पा’ दोघेही हवे असल्याचे म्हटले. तिच्या या म्हणण्यानंतर दोघेही आपापसांतील वाद विसरले आणि नव्याने संसार सुरू केला.
प्रत्येक दांपत्याच्या आयुष्यात मुलाचे अन्यसाधारण महत्त्व आहे. हे पटवून् दिल्यास आपापसांतील वाद विसरून दोघे एकत्र येऊ शकतात. इथेही तेच घडले. समुपदेशन केल्यानंतर मुलीच्या भवितव्याचा विचार करून दोघे एकत्र आले. – अॅड. प्रणयकुमार लंजिले, पतीचे वकील.