मार्केट यार्ड – करोनामुळे शहर अडचणीत आहे. रोजगार आणि पैशांअभावी सर्वसामान्य रोजच जगण्याची लढाई लढत आहेत. गरजूंना किमान चार घास खावून जगता यावे, यासाठी काही दानशुरांनी पुढाकार घेतला आहे. ते अन्नधान्यांचे वाटप करीत आहेत. गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या अन्नदात्यांना मार्केट यार्डातील व्यापारीही खरेदीच्या दरात माल देवून माणुसकीचे दर्शन घडवित आहेत.
शहरात मजूर, काच, कचरा वेचकांसह सफाईचे काम करणारा वर्ग मोठा आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने बहुतांश मजूर शहरातच थांबले आहेत. मात्र, सध्या रोजगार थांबल्याने ते सध्या संकटात सापडले आहेत. त्यांना ज्या व्यक्ती, संस्था, संघटना अन्नधान्यांची मदत करीत आहेत. अशांना मार्केट यार्डातील व्यापारीही मदत करीत आहेत. त्यांच्याकडून जो माल मागितला जात आहे. तो व्यापारी खरेदीच्या दरात दानशुरांना उपलब्ध करून देत आहेत.
काळ कठीण आहे. याचे भान सर्वांनीच राखले पाहिजे. एखादा दुसरा व्यक्ती तुटवड्याच्या नावाखाली अधिक दराने मालाची विक्री करीत असेल, तर ते चुकीचे आहे. त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. मात्र बहुतांश व्यापारी जिथे मदत लागेल तिथे मदतीचा हात देत आहेत. त्यामुळे एकामुळे सर्वांचीच बदनामी नको.
– राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष, दि पुना मर्चंटस् चेंबर