बाह्यवळणाची अद्याप प्रतीक्षाच : नित्याच्या कोंडीला वाहनचालक वैतागले
रविंद्र वाळके
अवसरी – खेड-पेठ घाटातून प्रवास करणे म्हणजे खोळंबा आणि वाहतूक कोंडीचा फटका असा दुहेरी जाच असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे प्रवाशांना अवघड बनले आहे. या रस्त्यावर सतत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने लवकरात लवकर प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरणाचा मोठा गाजावाजा करीत गेल्या काही वर्षापूर्वी भूमिपूजन झाले. त्यानुसार नाशिक फाटा ते राजगुरूनगर रस्त्याचे पहिल्या टप्प्यात चौपदरीकरण झाले. त्यानंतर राजगुरूनगर घाटाच्या पुढील पुरोहित ढाबा ते गायमुख (अवसरी) चौपदरीकरण झाले. त्यानंतर कळंब गावाच्या उत्तरेस असणारा वर्पे मळा ते नारायणगाव रिलायन्स पेट्रोल पंप, मुक्ताई ढाबा ते आळेफाटा हा चौपदरीकरण पार पडले. आळेफाटा ते पुढील रस्ता चौपदीकरन पूर्ण झाले आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नाशिकवरून पुण्यापर्यंत किंवा पुण्यावरून नाशिक पर्यंत अनेक प्रवासी दररोज प्रवास करत असतात.
अनेक व्यापारी सकाळी नाशिकवरून पुण्याकडे येऊन आपापली कामे उरकून सायंकाळी नाशिककडे परतत असतात. नाशिक – पुणे महामार्गावर नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी फाटा, मोशी, भोसरी, नाशिक फाटा ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या रस्त्यावर अनेक मोठ्या लोकसंख्येची अनेक गावे आहेत. त्यातील अनेकठिकाणी लहान मोठे उद्योग धंदे, एमआयडीसी आणि कारखानदारी उभी राहिलेली आहे. पर्यायाने या भागात लोकसंख्या वाढली. त्यामुळे दळण वळणाची साधने सुद्धा वाढत गेली; परंतु रस्त्याचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही. अनेक छोटे मोठे रस्ते या महामार्गाला येऊन मिळाले; परंतु शासनाने योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने आणि या मार्गावर नेहमी प्रवाशांची वर्दळ असल्याने आळेफाटा, नारायणगाव, मंचर, अवसरी पेठ घाट, पेठ राजगुरूनगर घाट, खेड, आंबेठाण, चाकण चौक, आळंदी फाटा मोशी, भोसरी या भागात वाहतूक कोंडी नित्याची होऊन बसली.
पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी-पेठ घाट तसेच खेड घाट हे दोन जुने घाट लागत होते. या घाटात वाहतूक कोंडी नित्याची झाली होती; मध्यंतरीच्या काळाश्र वनविभागाच्या परवानगीने अवसरी-पेठ घाटाचे बाह्यवळण पूर्ण झाले. त्यामुळे या घाटात होणारी वाहतूककोंडी पूर्णपणे बंद झाली व नागमोडी वळण यामुळे होणारे अपघातही कमी होऊन वाहनांना सरळ मार्ग उपलब्ध झाला. त्याच पद्धतीने खेड घाटात अनेक ठिकाणी नागमोडी वळणे असल्याने घाटात वाहने बंद पडणे, वाहनांचे अपघात होणे हे नित्याचेच होत आहे.
गेल्या पंचवार्षिकमध्ये ह्या घाटाला रुंदीकरण किंवा पर्यायी मार्ग शोधणे ऐवजी घाटाच्या पूर्वेकडून बायपास करण्याचे केंद्र सरकारने ठरवले. त्यानुसार काही काळ काम सुरूही झाले; परंतु मध्यंतरीच्या काळात कंत्राटदार काम अर्धवट सोडून गेले. त्यामुळे या बायपासच्या कामाला गती मिळाली नाही.
मोठे बाह्यवळण घेण्यामागचे कारण गुलदस्त्यात ?
खेड घाटाच्या पूर्वेकडून बाह्यवळण रस्ता बनवला असता तर एक बाजूने वाहने जाण्यास आणि एका बाजूने वाहने येण्यास रस्ता वापराला असता तरीसुद्धा बऱ्यापैकी वाहतूककोंडी कमी झाली असती; परंतु एवढे मोठे बाह्यवळण घेऊन अनेक ठिकाणी डोंगर पोखरून, कमीत कमी दोन ते तीन ठिकाणी अवाढव्य पुलाचे बांधकाम करून या बाह्य वळणाचा घाट कुणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या मर्जी खातर केला गेला आहे काय? अशी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीत दबक्या आवाजात चर्चिला गेला. या कामाच्या कंत्राटदाराकडून लोकप्रतिनिधींनी लाभाची अपेक्षा ठेवल्याने या कामावरील अनेक कंत्राटदार काम सोडून गेले असल्याचे लोकसभेच्या निवडणूक पूर्वकाळात चर्चा ऐकायला मिळत होती.
खासदार बदलले, परिस्थिती “जैसे थे’ – लोकसभा निवडणुकीत या वाहतूक कोंडीचा मुद्दा प्रभावी ठरला आणि तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपली खासदारकी गमवावी लागली. डॉ. अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर तरी रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी आशा खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यातील जनतेला होती; परंतु जेवढ्या प्रमाणात या कामाने वेग घ्यायला पाहिजे होता तेवढा वेग कामाला आला नाही. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडीचा त्रास काही कमी झाला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाला वेग देण्याचा प्रयत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला असला तरीही सद्यपरिस्थितीत हे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे.
काम पूर्ण होण्याची तारीख सांगा – बायपासचे काम कधी पूर्ण होईल याची खात्री सध्या प्रवाशांना देता येत नाही. त्यामुळे पुणे, मुंबई याकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना खेड घाटाचाच वापर करावा लागत आहे. घाटात तीव्र, वेडी वाकडी अवघड वळणे व तीव्र चढ-उतार असल्याने अनेक वाहने बंद पडणे किंवा तीव्र उतार असल्याने अनेक वाहनांचे ब्रेक फेल होऊन अपघात होणे असे वारंवार प्रकार घडत आहेत. एखादे अपघातग्रस्त वाहन बंद पडले तर तात्काळ मदत कार्य मिळत नसल्याने मागून येणाऱ्या वाहनांना किंवा त्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाहिजे तेवढा रस्ता उपलब्ध होत नाही आणि वाहतूक कोंडीला सुरुवात होते.
घाटातील काम दर्जेदार व्हावे – राजगुरूनगर बायपास घाटात होणारे काम हे दर्जेदार व्हावे, अनेक ठिकाणी डोंगर पोखरून रस्ता केल्याने डोंगराचे सुटलेले कडे मोकळे आहेत. जरी काम करताना जाळी लावली तरी याभागात माती आणि दगडाचे प्रमाण डोंगरात जास्त आहे. त्यामुळे कधीही हे कडे कोसळू शकतात याचे भान काम करताना ठेवले पाहिजे. याकामी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे अधिकारी, प्रशासन, राज्य सरकार यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून शक्य तितक्या लवकर उच्च दर्जाचा बाह्यवळण आणि घाटाचे बायपासची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी नागरिक, प्रवासी करीत आहेत.
पंतप्रधानांकडून भूमिपूजन –
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात बालेवाडी येथे आले असता रखडलेल्या बाह्यवळणाचे भूमिपूजन केले होते. परंतु मध्यंतरीच्या काळात बायपासच्या कामांनी जेवढा वेग घ्यायला पाहिजे होता तेव्हा घेतला नाही.