मुंबई – गेल्या दोन वर्षात भारतातील खासगी आणि सरकारी बँकांनी आपली कामगिरी सुधारली आहे. या बँकांच्या उनुत्पादक मालमत्ता कमी होऊन कर्ज पुरवठा वाढला आहे. त्यामुळे शेअर बाजारात बँकांचे व्यवहार अधिक होत होते. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून भारतीय बँका जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र गुरुवारी एचडीएफसी बँक आणि इतर बँकांच्या शेअरची तुफान विक्री झाली आणि भारतातील बारा मोठ्या बँकांचे बाजार मूल्य तब्बल 21 अब्ज डॉलरने कमी झाले.
ही पडझड येथे थांबणार आहे की, आगामी काळातही बँकांची शेअर बाजारावरील कामगिरी निराशाजनक राहणार आहे याबाबत आता गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षात शेअर बाजारात बँकांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे बँकांचे बाजार मूल्य 433 अब्ज डॉलरवर हजार गेले होते. मात्र एकाच दिवसात हे मुल्य 21 अब्ज डॉलरनी कमी होणे गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे.
दोन महिन्यापासून शेअर बाजारात तेजी होती. या तेजीचे नेतृत्व बँक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने केले. गुरुवारी हा आलेख चढता राहणार नाही असे स्पष्ट झाले. एचडीएफसी बँकेचे व्याजातील उत्पन्न कमी होत असताना दुसरीकडे ठेवींचे प्रमाण कमी होत आहे. असा प्रकार इतर बँकांच्या बाबतीतही घडू शकतो. त्याचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो की काय अशी चर्चा आहे.
बँकांच्या शेअरचे भाव त्यांच्या मूळ क्षमतेपेक्षा जास्त आहेत. जर खासगी बँकांन व एनबीएफसीनी बाजारातील आपला वाटा वाढविण्यासाठी नफ्याचा बळी देऊन कर्ज वितरणाचे प्रयत्न केले तर या बँकांच्या ताळेबंदावर परिणाम होऊ शकतो.
इतर बँकांच्या ताळेबंदाकडे लक्ष
एचडीएफसी बँकेच्या ताळेबंदानंतर आता गुंतवणूकदारांचे लक्ष इतर खासगी बँकांच्या ताळेबंदाकडे लागले आहे. 20 जानेवारी रोजी आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक आपला दुसर्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर करणार आहेत. अॅक्सिस बँक 23 जानेवारी रोजी आपला ताळेबंद जाहीर करणार आहे. आतापर्यंत ज्या छोट्या सरकारी बँकांनी ताळेबंद जाहीर केले आहेत त्यांची परिस्थिती समाधानकारक आहे.