नगर -मुलांना प्राथमिक स्तरावर विविध खेळांच्या माहितीसह त्यांची नियमावली, खेळांसाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री, खेळांबाबत वैशिष्टे ही माहिती मिळवून त्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी शालेय मैदानी स्पर्धा घेण्यात येतात. मात्र नगरमध्ये या मैदानी स्पर्धा घ्यायच्या म्हणून घेतल्या जात असल्याचे आढळून आले. मैदानाची आखणी न करताच या स्पर्धा गेल्या दोन दिवसांत आटोपत्या घेतल्या. 400 मीटर, 100 मीटर धावण्यासाठी धावणी मार्ग (ट्रॅक) न आखता बांबू लावून त्यांच्या भोवती गोल मुलांना धावण्यास सांगण्यात आले. गोळा, थाळी, भाला, लांब उडीसाठी गल्ली खेळ्याप्रमाणे काडीने रेष मारलेली तीही गायब झाल्याने मुलांनीच ती रेष ठरवून तेथून उडी मारणे किंवा गोळा, भाला फेकणे असे चित्र नगर तालुका शालेय मैदानी स्पर्धेत दिसून आले.
एकीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने तब्बल 107 पदे पटकावून देशाची मान उंचावली असतांना दुसरीकडे मात्र त्या खेळांबाबत जिल्हास्तरावर अशा प्रकारे अवहेलना होत असल्याचे चित्र आहे. लहान वयात मुलांना खेळांचे महत्व व आवड निर्माण तसेच त्यांच्या खेळाडू वृत्ती निर्माण होण्यासाठी शासनाकडून दरवर्षी शालेय मैदानी स्पर्धा घेण्यात येतात. तालुका, जिल्हास्तरावर या स्पर्धा घेण्यात येतात. त्यातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिके देखील देण्यात येतात. 9 व 10 ऑक्टोबर दरम्यान नगर तालुकाच्या शालेय मैदानी स्पर्धा येथील वाडीया पार्क मैदानावर सुरू होत्या.
त्याबरोबर जिल्हास्तरावरील कब्बडी स्पर्धा देखील या ठिकाणी झाल्या. शालेय मैदानी स्पर्धेसाठी तब्बल 30 स्पर्धांची यादी आहे. 14, 17, 19 वयोगटातील मुला, मुलींसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या. 9 रोजी मुलींसाठी या स्पर्धा झाल्या तर 10 ऑक्टोबर मंगळवारी मुलांसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून विविध खेळांच्या संघटनाच्या सहकार्याने या स्पर्धा होतात. त्यासाठी खास समिती स्थापन करण्यात येते. या स्पर्धासाठीच्या विविध खेळांसाठी कोठेही मैदानी आखणी करण्यात आली नव्हती. खेळांच्या पंचाकडे जो खेळ दिला आहे. तोच आपल्या पद्धतीने मुलांना सांगून स्पर्धा आटोपती घेत होता.
या स्पर्धात त्यात 5 हजार, 3 हजार, 1 हजार 500, 800, 600, 400, 200, 100 मीटर धावणे, 400 मीटर रिले या धावण्याच्या स्पर्धेसाठी मैदानाची आखनी देखील करण्यात आली नव्हती. मुलांना कोठून- कोठेपर्यंत धावायचे हे देखील कळत नव्हते, धावणी मार्गची आखणी करण्यात न असल्याने मुलांना धावतांना अडचणी येत होत्या. एकामागे एक अशा प्रद्धतीने त्यांना धावावे लागत होते. केवळ 400 मीटर धावण्यासाठी बांबू लावण्यात आले होते. या बांबूच्या भोवतीच गोल धावण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मुलांना केवळ या बांबू भोवती धावणे माहिती झाले. धावणे स्पर्धेसाठी ट्रॅक असतो हे त्यांना कळलेच नाही.
ती स्थिती गोळा, भाला, थाळी व लांब डडीची होती. कोठून धावत यायचे आणि कोठून गोळा, भाला व लांब उडी मारायची हे रेष गायब होती. मुलांनी ती ठरवून तेथून उडी मारणे व भाला फेकला. या अशा पद्धतीने जर शालेय क्रीडा स्पर्धा होणार असतील तर मुलांना खेळांची माहिती, नियमावली, आवड कशी निर्माण होणार असा प्रश्न आहे. केवळ स्पर्धा द्याव्या लागतात म्हणून घेतल्या जाणार असतील तर नगर जिल्ह्यातील खेळांडू कधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिल्ह्याचे आणि आपले नाव कमविणार ?