श्रीनगर – आपल्याला आपल्या घरातच सरकारने स्थानबद्ध करून ठेवले असल्याचा दावा पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शोपियानमध्ये अलीकडेच दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलेले काश्मिरी पंडित सुनील कुमार भट यांच्या कुटुंबाला भेट देण्यापासून रोखण्यासाठी सरकारने त्यांच्यावर ही कारवाई केली असावी.
ट्विटरवर मुफ्ती यांनी त्यांच्या निवासस्थानाचे कुलूपबंद गेट आणि बाहेर उभ्या असलेल्या सीआरपीएफ वाहनाची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. मेहबुबांनी असा आरोप केला आहे की, केंद्र सरकारच्या आक्रस्ताळेपणाच्या धोरणामुळेच काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत.
भारत सरकार काश्मिरी पंडितांची दुर्दशा लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून ती दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या समस्यांवर आम्ही आवाज उठवू इच्छितो म्हणूनच आम्हाला नजरकैदेत ठेवले गेले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
हत्या झालेले काश्मिरी पंडित सुनीलकुमार भेट यांचे कुटुंब छोटीगाम येथे राहते. त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करण्याचा इरादा मेहबुबा यांनी जाहीर केला होता. त्यानंतर त्यांच्यावर ही स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.