नवी दिल्ली – रिऍल्टी क्षेत्र वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. 2021 मध्ये भारतातील आठ मोठ्या शहरात घरांच्या किमती तीन ते सात टक्क्यांपर्यंत वाढल्या. या कालावधीत घर विक्री 13 टक्क्यांनी वाढली, तर घरांच्या नव्या योजना 75 टक्क्यांनी वाढल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.
प्रॉप टायगर डॉट कॉम या संस्थेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2019 मध्ये 2,05,936 घरांची विक्री झाली आहे. 2020 मध्ये 1,82,639 घरांची विक्री झाली होती. 2020 मध्ये 1.22 लाख घरांच्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. 2022 मध्ये ही संख्या 2.14 लाख इतकी झाली आहे.
अहवालकर्त्या प्रॉप टायगर डॉट कॉम या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अग्रवाल म्हणाले की, भारतातील रिऍल्टी क्षेत्रामध्ये वाढण्याची अंगभूत क्षमता आहे. करोनामुळे अनेक वेळा लॉक डाऊन करण्यात आले असूनही या कालावधीत या क्षेत्राने आपली उमेद सोडली नाही. भारतातील घरांची गरज आणि पुरवठ्यातील तुटीमुळे हे क्षेत्र वेळोवेळी वेगाने पूर्वपदावर आले. या क्षेत्राचे महत्त्व ओळखून केंद्र आणि राज्य सरकारने काही पूरक उपाययोजना केल्या. रिझर्व बॅंकेने या कालावधीत व्याजदर कमी पातळीवर ठेवले. यामुळे या क्षेत्रातील घडामोडी वाढत राहिल्या.
घाऊक महागाई वाढल्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आठ मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमतीही या कालावधीत बऱ्याच प्रमाणात वाढल्या. मात्र विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. अहमदाबाद, हैदराबाद शहरातील घराचे दर सात टक्क्यांनी वाढले. बंगलोर शहरातील घराचे दर तीन टक्क्यांनी, पुण्यातील 4 टक्क्यांनी तर मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकात्यातील घरांचे दर पाच टक्क्यांनी वाढले. आता मागणी आणि पुरवठ्यातील संतुलन वेगाने पूर्वपदावर येत आहे आणि विकसक दीर्घ पल्ल्याच्या योजन असल्याचे दिसून येत आहे.