सुरेश डुबल
कराड – आरोग्यासाठी गूळ महत्त्वाचा. काही वर्षांपूर्वीपर्यंत आहारात सर्रासपणे गुळाचा वापर केला जायचा. गूळ हा शरीरालाही हितकारकच. उसावर प्रक्रिया करून गूळ तयार करण्यासाठी गावागावात गुऱ्हाळघरे होती. मात्र जसजसा काळ बदलत गेला तसतसा या गुळाची गोडी कमी झाली आणि त्याची जागा साखरेने घेतली. साखर कारखान्यामुळे गुऱ्हाळघरे अस्तित्वहीन होऊ लागली आहेत. आता बोटावर मोजण्याइतपतच गुऱ्हाळघरे सुरू असून त्यांनाही मजूर व उसाच्या तुटवड्यामुळे घरघर लागल्याचे चित्र तालुक्यात दिसू लागले आहे.
कराड तालुका हा ऊसपट्टा म्हणून ओळखतात. सरासरी 70 टक्के शेतकरी आपल्या शेतात उसाची लागण करतात. या भागात भरपूर पाणी असल्याने जुन्या काळापासूनच हा ऊस शेतकऱ्यांना प्रिय झालेला आहे. काही मोजकेच साखर कारखाने असताना या उसावर प्रक्रिया करण्यासाठी गावोगावी पाच ते दहा गुऱ्हाळघरे असायची. ऊस तोडीची सुगी सुरू झाली की, त्या-त्या गावातील शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळ घराला द्यायचा. तेथे उसाचा रस काढून त्यावर प्रक्रिया करून गूळ तयार केला जात होता.
त्यानंतर तो गूळ विक्रीसाठी बाजारपेठेत विकला जायचा. आरोग्यास हितकारक असल्याने गुळासही मोठी मागणी असायची. शेतकऱ्याला यातून दोन पैसे मिळायचे. जेव्हा गुऱ्हाळघरे मोठ्या प्रमाणात होती, तेंव्हा साखर कारखाने देखील होते, मात्र गुळाची चव न्यारी असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा ओढा गुऱ्हाळघरांकडे होता. त्यामुळे सुपने, वनवासमाची, केसे, वारुंजी, आगाशिवनगर, पाडळी, खोडशीसह इतर बऱ्याच गावात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळघरे होती. मात्र हळूहळू काळ बदलत गेला. या बदलत्या काळात गुळाची गोडी हळूहळू कमी होऊ लागली.
त्याची जास्तीची जागा साखरेने घेतली. सुरुवातीला उसावर प्रक्रिया करणारे सहकारी तत्त्वावर चालणारे कारखाने होते. मात्र उसाचे वाढते क्षेत्र व शेतकऱ्यांच्या ऊस तोडीस होणारा विलंब यामुळे खासगी कारखान्याची गरज भासू लागली. त्यामुळे ते खासगी कारखाने देखील उभे राहिले. सहकारी व खासगी कारखाने यामुळे शेतकऱ्यांचा ऊस मुदतीत साखर कारखान्यात जाऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील गुऱ्हाळघराकडे पाठ फिरवली.
गुऱ्हाळघरांसाठी लागणाऱ्या कामगारांनाही कारखान्यांकडून जास्तीचे पैसे मिळू लागले. मग तेही साखर कारखान्याच्या कामात गुंतून गेले. आता ज्या शेतकऱ्यांचा शेअर्स नाही, ज्यांना आपल्या शेतातील ऊस लवकर घालवायचा आहे, असे शेतकरी आपला शेतातील ऊस गुऱ्हाळघरांना देत आहेत. अशा शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने गुऱ्हाळघरे देखील मोजकीच राहिली आहेत. सुरुवातीला गावागावात असणारी गुऱ्हाळघरे आता कमी झाली असून, फक्त बोटावर मोजण्याइतपतच त्यांची संख्या उरलेली आहे.
वेळी अवेळी पडणारा पाऊस, कामगारांचा तुटवडा, शेतकऱ्यांची गुऱ्हाळघराकडे फिरकलेली पाठ यामुळे गूळ बनवण्याचा व्यवसायही अडचणीत आला आहे. परिणामी सध्या बोटावर मोजण्याइतपत असणारी गुऱ्हाळघरेही दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहेत. एक काळ असा होता की, कराड तालुक्यातील गूळ हा गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ अशा ठिकाणी जायचा. तेव्हा तालुक्याचे नाव दूरवर पोहोचायचे. आता मात्र ती परिस्थिती राहिलेली नसून गुऱ्हाळघरे अडचणीत सापडलेली आहेत.