नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताबरोबरची थांबवलेली टपाल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र पार्सल सेवा अजूनही बंदच असल्याचे सांगगण्यात येत आहे. गेले तीन महिने ही सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. त्यातच आता पाककडून टपाल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने टपाल सेवा बंद केली होती पण ती पुन्हा सुरू करण्यात आल्याचे वृत्तपत्रातील बातम्यात म्हटले आहे. 5 ऑगस्ट रोजी भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले राजनैतिक संबंध निम्न स्तरावर आणून भारतीय उच्चायुक्तांना मायदेशी पाठवले होते. त्याचवेळी पाकिस्तानने भारताशी दळणवळण व इतर व्यापार संबंधदेखील तोडले होते.
पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे की टपाल सेवा आता सुरू करण्यात आली असून पार्सल सेवा अजूनही बंदच आहे. पाकिस्तानने टपाल सेवा अंशत सुरू केल्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही. फाळणी, युद्ध व सीमेवरील तणावाच्या सर्व काळात दोन्ही देशांतील टपाल सेवा सुरू होती पण आता ती बंद करण्याचा निर्णय हा अभूतपूर्व होता.
दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ऑक्टोबरमध्ये असे सांगितले होते की, पाकिस्तानने टपाल सेवा थांबवण्याचा निर्णय एकतर्फी असून त्यापूर्वी भारताला सूचना देण्यात आली नव्हती. पाकिस्तानचा हा निर्णय जागतिक टपाल संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे पण शेवटी पाकिस्तान तो पाकिस्तानच आहे, असे म्हणत पाकला टोला लगावला आहे.